डिजिटल महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील तरडोली हद्दीतील तांबे-धायगुडेवस्ती येथील अंगणवाडी केंद्रासमोरील धोकादायक अवस्थेतील विद्युत खांब व खाली झुकलेल्या वीजतारांमुळे लहान मुले, महिला आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या समस्येची जिल्हा परिषद सदस्या रोहिणी संदीप कदम (ढोले) यांनी तातडीने दखल घेत संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर महावितरण विभागाने त्वरित कार्यवाही करत धोकादायक विद्युत खांबाचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर पूर्ण केले.
अंगणवाडी सेविका रुक्मिणी कांबळे तसेच ग्रामस्थांनी या धोकादायक खांबामुळे संभाव्य अपघाताची भीती व्यक्त करत तो तातडीने हलविण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत जिल्हा परिषद सदस्या रोहिणी कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा केला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रोहिणी कदम यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महावितरण विभागाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत आवश्यक ती कार्यवाही केली. त्यामुळे अंगणवाडीतील बालके, महिला व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून संभाव्य अपघाताचा धोका टळला आहे.
यावेळी रोहिणी कदम म्हणाल्या, "लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रत्येक प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे ही आपली जबाबदारी आहे. संबंधित विभागाने तत्परतेने कार्यवाही केल्यामुळे संभाव्य अपघात टळला असून ग्रामस्थांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे."
या तातडीच्या कार्यवाहीबद्दल ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी संदीप कदम (ढोले) तसेच महावितरण विभागाचे एस. ई. लाहमगे साहेब यांचे आभार व्यक्त केले.


Post a Comment
0 Comments